मुंबई :  अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते, असा गौप्यस्फोट राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम  यांनी केला आहे. या आघाडीसाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो असेही रामदास कदम म्हणाले.


अहमदनगर महापौर निवडणुकीबाबत रामदास कदम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला आहे. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी जागा घेईल अशी भीती आम्हाला वाटत आहे.

अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने  पुन्हा एकदा राष्ट्रवादी भाजपाबरोबर आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही कदम म्हणाले. पुन्हा एकदा भाजपाने राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आहेत, असा आरोप कदम यांनी केला.

अहमदनगर प्रकरणाबाबत मी अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो, असेही कदम म्हणाले.

अहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला?


अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली आणि जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. मात्र नगरमध्ये शिवसेनेचा गेम कसा काय झाला, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक पार पडली. मात्र निवडणूक गाजली, ती तिथे झालेल्या अनपेक्षित युतीमुळेच. दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेचा निकाल लागला. 68 जागा असलेल्या अहमदनगरमध्ये बहुमतासाठी 35 जागांची बेगमी करावी लागते.

अहमदनगरच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मात्र मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.

अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना  24

राष्ट्रवादी 18

भाजप 14

काँग्रेस 5

बसपा 4

सपा 1

अपक्ष 2

पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कर्नाटकात जे काँग्रेसने केलं, तेच भाजपने अहमदनगरमध्ये केलं, आकड्यांची जुळवाजुळव इतकी पक्की केली की भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना 37 मतं मिळाली.

अहमदनगरमध्ये कमळ कसं फुललं?

भाजप            14
राष्ट्रवादी         18
बसपा             04
अपक्ष             01

एकूण            37

अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा नाही, असे आदेश असतानाही नगरसेवकांनी भाजपला मत का दिलं? याची चौकशी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली. नगरसेवकांकडून खुलासा मागितला असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे आधी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा आणि मग कारवाईचा इशारा अशी दुतोंडी भूमिका राष्ट्रवादी बजावत आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापौर निवडणुकीतली ही यारी-दोस्ती लक्षणीय ठरली आहे. देशासह राज्यात आघाडी-महाआघाडीचे वारु दामटवण्याचा प्रयत्न सुरु असताना अहमदनगरने मात्र वेगळंच राजकीय वळण घेतलं. लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होतोय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.