मुंबई: दिवाळीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल झालं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजप आणि शिवसेनेनं मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत आज अधिकृत घोषणा केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीची घोषणा केली आहे.
राज्यभरातील 212 नगरपालिकांसाठी राज्यपातळीवर युती करण्यात आली आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच भाजप आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या घरी बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.




चांद्यापासून बांद्यापर्यंत युती व्हावी हीच उद्धव ठाकरेंची इच्छा: संजय राऊत

'चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र युती व्हायला हवी अशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळेच दिवसभर याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना-भाजपच्या युतीचा निर्णय घेण्यात आला आहे.' अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

'तसेच हा निर्णय 212 नगरपालिकांबाबत घेण्यात आला आहे. नगरपालिका निवडणुकींसाठी युतीचा निर्णय घेण्यात आला असून महानगरपालिका निवडणुकीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच या निर्णयानं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हे दोघेही खुश आहेत.' असंही राऊत म्हणाले.

भाजप-शिवसेनेत कधीच मतभेद आणि मनभेद नव्हते: रावसाहेब दानवे

'भाजप-शिवसेनेमध्ये राज्यपातळीवर युती झाली आहे. तसेच जिल्हा पातळीवरही युतीचे निर्णय देण्यात आले आहेत. जर जिल्हा पातळीवर काही समस्या निर्माण झाली तर राज्य पातळीवर त्याबाबत चर्चा करुन निर्णय घेतले जातील. भाजप आणि शिवसेनेत कधीच मतभेद आणि मनभेद नव्हते.' असं रावसाहेब दानवे म्हणाले.

संबंधित बातम्या:

उद्धव-मुख्यमंत्र्यांचा फोन कॉल, स्था.स्व. निवडणुकीत युती पक्की?