शिवसेना-भाजप एकत्र येतील, याची 200 टक्के खात्री : पाटील
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2017 11:17 AM (IST)
कोल्हापूर : मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र येतील याची मला 200 टक्के खात्री आहे, असा विश्वास भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते कोल्हापुरात बोलत होते. मुंबई महापौरपदासाठी शिवसेना सोबत आली नाही, तर भाजपला सर्व पर्याय खुले आहेत, असा सूचक इशारा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. त्याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, "काही गोष्टींची औपचारिकता पूर्ण झाल्यावर शिवसेना-भाजप नक्कीच एकत्र येतील." "शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करेन," असं सांगताना मुंबई महापालिकेसाठी सन्मानाने आणि न्यायाने तोडगा निघेल, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील बेळगाव विमानतळावर समोरासमोर आले. मात्र उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांशी बोलणं टाळलं आणि केवळ स्मितहास्य करत नमस्कारावर निभावून नेलं. विमानतळावर उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र... शिवसेना सोबत न आल्यास भाजपला सर्व पर्याय खुले : गडकरी