Shiv Sena MP Sanjay Raut Press Conferance : सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकांवरुन राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सातत्यानं जडत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचेचं असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींचा दुरुपयोग केला, असा घणाघाती आरोपही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी बोलताना केला आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "संभाजी छत्रपती यांना भाजपकडून कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला जात होता, हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपला स्वतःचा उमेदवार टाकायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे. पण यासाठी छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असू द्या. लोकशाही आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात कोणीही घोडेबाजार करुन अशा प्रकारच्या निवडणुका लढणार असतील, तर सरकारचंही सर्व घडमोडींवर बारिक लक्ष आहे. एवढंच मी सांगू शकेन. आम्ही आमचा उमेदवार म्हणून संजय पवार यांना उतरवलं आहे. मला आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण खात्री आहे की, जेवढी मतं हवीत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील." तसेच, शिवसेनेव्यतिरिक्त महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणखी दोन उमेदवार देखील विजयी होतील आणि महाविकास आघाडीचे आणखी 4 उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. 


काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीबाबत मी बोलणार नाही. कारण माझ्यापर्यंत कोणी येणार नाही. कोणत्या विषयावर नाराजी आहे, काय आहे? हा त्यांचा हायकमांडचा प्रश्न आहे." पुढे बोलताना महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नाराजीवर बोलताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील धुसफूस यावरुन होणाऱ्या आरोपांबाबत काहीच तथ्य वाटत नाही. जर तसं काही असेल तर मुख्यमंत्री थेट सोनिया गांधींशी फोनवरुन संवाद साधतात. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांच्यात उत्तम संवाद आहे." हा दबावतंत्र तर नाही असं विचारल्यावर उद्धव ठाकरे असे नेता आहेत, ज्यांच्यावर कोणतंही दबावतंत्र चालत नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :