मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava ) घेण्याची परवानगी हाय कोर्टाने शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. "न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात देखील शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल. आमची न्यायाची बाजू आहे. आमच्याकडे कोणतीही खोट नाही. आम्ही प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेतो. येवळी देखील ही दक्षता देण्यात येईल आणि दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. 


न्यायदेवतेचे आम्ही मनापासून आभारी आहोत. न्यायालयात सत्याचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरे देखील पहिल्यापासून  न्यायदेवतेवर आमचा विश्वास असल्याचे सांगत होते. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होईल याची खात्री होती. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा देखील दसरा मेळावा झाला. परंतु, यावेळी शिंदे गट आणि भाजपकडून शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हस्तक्षेप करण्यात आला. दसरा मेळाव्यात खोडा घालण्यासाठी शिंदे गटाच्या एका आमदाराने न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे यावर्षी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. 


'आमदारांना शांततेचे धडे द्यावेत'
न्यायालयाने आज जो निर्णय दिलाय त्यावरून तरी आता भाजप आणि शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात येण्याचं बंद करावं. दसरा मेळाव्याला कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. परंतु, शिंदे गट गेल्या दोन महिन्यापासून पिसाळला आहे. त्यांच्या गटातील काही आमदार गुंडगीरी करत आहेत. शिवसैनिकांना मारण्याची धमकी देत आहे, शिवाय पोलिस ठाण्यात गोळीबार करत आहेत. त्यामळे सरकारने आपल्या आमदारांना शांततेचे धडे द्यावेत, अशी टीका विनायक राऊत यांनी शिंदे गटावर केलीय. 


दरम्यान, शिवसेना नेते अनिल परब यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. 'शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी आमचा अर्ज पालिकेकडे पाठवला होता. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव पालिकेने परवानगी नाकारली होती. परंतु, न्यायालयाने बीएमसी बाबतीत आपलं निरीक्षण केलं आणि आमच्या बाजूनं निकाल दिला. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची आहे. आम्ही सुद्धा त्याचं पालन करू.  2012 ते 2016 ला उच्च न्यायालयातून परवानगी आम्ही घेऊन शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहोत. परंतु, सदा सरवणकर यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आमची शिवसेना खरी शिवसेना असं ते म्हटले. परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. 


महत्वाच्या बातम्या


Shiv Sena Dasara Melava Verdict: ठाकरेंचा पहिला मोठा विजय, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी