शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील कळस गावात चोरीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. या गावात पिण्याच्या पाण्याच्या जुन्या विहिरीत चोरीच्या मोटारसायकली सापडल्या आहेत. पाण्यावर आलेला ऑईलचा तवंग बघून संशय आल्याने टाकलेल्या गळाला मोटरसायकल लागल्या आहेत. आतापर्यंत या विहिरीतून पंधरा मोटरसायकली काढल्या असून अजूनही अनेक मोटरसायकली या विहीरीत असण्याची शक्यता आहे.


अकोले तालुक्यातील कळस गावातील ही घटना आहे. गावातील प्रवरा नदीच्या जवळ असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या जुन्या विहिरीत ऑईलचा तवंग आल्याचं पाहून नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर विहीरीत गळ टाकला असता त्यातून मोटरसायकल निघाली.  आतापर्यंत जवळपास पंधरा मोटरसायकल विहिरीतून बाहेर काढल्या आहेत.


विहीरीत पाणी जास्त असल्याने आता मोटरपंप लावून पाणी बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर आणखी किती मोटरसायकली या विहिरीत आहेत याची माहिती मिळू शकेल. आतापर्यंत निघालेल्या या मोटरसायकली दीड दोन वर्षापूर्वी अकोले आणि संगमनेर तालुक्यातून चोरीला गेलेल्या आहेत. चोरांनी या गाड्यांचे काही पार्ट काढून घेतले आणि मोटरसायकली विहिरीत टाकून दिल्या आहेत. परिसरातील आणखीही विहिरीत गाड्या आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत. आता पोलिसांनी या गाड्या चोरांना पकडण्याचे आव्हान आहे.