सांगली: महाराष्ट्र चालवू शकतील असा माणसं म्हणून आपण जयंत पाटील यांच्याकडे पाहतो, अशा शब्दात शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत जाणाऱ्या नेत्यांना जयंत पाटील यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे होतं, असा टोलाही पवारांनी लगावला आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथे माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते.


जी मंडळी सध्याचा महाराष्ट्र चालवू शकतात. अशी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मंडळी आम्हाला राज्यात दिसतात. त्यात जयंत पाटील यांना आम्ही अग्रस्थानी पाहतो. जयंत पाटील यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे. गेली 30 वर्षे तुम्ही त्यांना साथ दिली आहे. तशीच साथ कायम ठेवा असे आवाहन शरद पवार यांनी केलं. जयंत पाटील राज्याचे नेतृत्व करू शकतात अशा शब्दात पवार यांनी जयंत पाटील यांचे कौतुक केले.



या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जीवनावर आधारित राजहंस या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

आज महाराष्ट्रात चालवू शकतील असा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे पुढील मुख्यमंत्री जयंत पाटील असतील असा अप्रत्यक्ष सुतोवाच या सभेत शरद पवार यांनी केला आहे. तसेच भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या वर टीका करताना जे मतदार संघाचा विकास होत नाही म्हणून सत्तेत गेलो असं सांगत आहेत त्यांनी जयंत पाटील यांच्याकडून कशा पद्धतीने काम करायचं असतं हे शिकून घेतलं पाहिजे होतं असा टोला पवारांनी लगावला.