मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे मत आहे. या सर्व पेचप्रसंगावर खासदार शरद पवार यांनी तोडगा काढावा, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. यावरच आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या ' माझा महाकट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.


मी लोकांशी संवाद साधणार आहे


"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे.  कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे," अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. 


शरद पवार काय म्हणाले, पाहा व्हिडीओ ?



संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात


"मुळात संवाद ठेवायला पाहिजे. आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जिवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं," असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. 


सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर लक्ष देणं गरजेचं


"गंमत अशी आहे की दुर्दैवाने दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे," असी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.


हेही वाचा : 


अजित पवारांना मोठा धक्का, आणखी एका आमदाराने साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार!


मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय? चर्चांना उधाण