पुणे : अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पवार कुटुंबातील कलहाबाबत देखील चर्चा होऊ लागली आहे. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,  पवार कुटुंबात यत्किंचीतही वाद नाही. पवार कुटुंबात कौटुंबिक कुठलेही निर्णय माझे असतात. आम्ही सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. आमच्या कुटुंबाची जी परंपरा आहे ती कायम राहील, असेही पवार म्हणाले.


आम्ही सगळेजण एका विचाराने वागतो. आमच्या घरात कुटुंबप्रमुखांचा शब्द अंतिम असतो. माझ्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कुठलेही निर्णय माझे असतात आणि त्याचा सन्मान सगळे करतात. आम्ही दिवाळीला सगळे एकत्र जमतो आणि पुढच्या वर्षीच्या कमाविषयीची चर्चा करतो. त्यात काही विषय आले तर माझा निर्णय अंतिम असतो आणि तो इथून पुढेही तोच अंतिम राहील, असेही ते म्हणाले. कृपया करून कुटुंबाविषयी काही गैरसमज पसरवू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.  लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

काल रात्रीच पुण्यामधील पूर परिस्थिती संदर्भात माहिती अजित पवार यांनी मला फोनवरून सांगितली. अजित पवार यांच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होत नाही. त्यांचा स्वभाव स्पष्टवक्ता आहे. मी कुटुंबप्रमुख म्हणून या प्रकरणात लक्ष घालणार आहे. ती माझी जबाबदारी आहे, असेही शरद पवार म्हणाले. काल, परवा आम्ही सोबत होतो. निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार ठरवतानाही ते होते. तिथंही त्यांची मतं त्यांनी ठेवली, असेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की, काकांसारख्या (शरद पवार) व्यक्तीला काहीही दोष नसताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यांचा काहीच सहभाग नसताना त्यांची चौकशी केली जाते, ही राजकारणाची पातळी घसरली आहे. आपण यातून बाहेर पडलेलं बरं, आपण शेती किंवा व्यवसाय करू. हे राजकारण गलिच्छ स्तराचे आहे, असे अजित पवारांनी त्यांच्या घरी सांगितले असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र मी त्यांच्याशी या संदर्भात बोलेन, कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले. माझं नाव आल्यामुळे अजित पवार यांची उद्विग्नता आहे. याविषयी मी त्यांना नक्की बोलेन, असेही पवार म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. पवार यांनी आपला राजीनामा  बागडे यांना मेलद्वारे पाठविला. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने तो स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले. या विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी असताना पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.