सोलापूर : मी कधीही सहज बोलत नाही, माझी विधानं विचारपूर्वक केलेली असतात, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल केलेल्या वक्तव्यांबाबत म्हटलं आहे. ते बार्शीत एका खाजगी कार्यक्रमाला आल्यावर बोलत होते.


 

 

छत्रपती शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूरचे छत्रपती संभाजी यांची भाजपकडून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, आधी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे मात्र आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला जातीय संदर्भ असल्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.

 

 

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, मी फक्त छत्रपतींचा सेवक आहे.

 

मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर


 

शरद पवारांच्या छत्रपती आणि पेशवे यांच्याबाबतच्या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात असले तरी, तेव्हा समर्थकांनी पवाराचं वक्तव्य हे मिश्कील असल्याचं म्हटलं होतं. त्या विधानाचं जातीय विश्लेषण करु नये, असंही सांगितलं होतं. मात्र आज शरद पवारांनी बार्शीमध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानंतर पेशवे आणि छत्रपती हे वक्तव्य हे मिश्कील नव्हतं तर विचारपूर्वक केलेलं गंभीर वक्तव्य होतं, हे ही स्पष्ट होतं.

 

 

आपण कधीही सहज बोलत नाही, या पवारांच्या वक्तव्याला एक स्थानिक संदर्भही असण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी बार्शीचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगलीमध्ये केलेलं भाषण सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं होतं. त्यावर बरीच टीका झाल्यानंतर सोपलांनी आपलं सांगलीमधील भाषण सहज केलेलं आणि कार्यकर्त्यांमध्ये हास्य पेरण्यासाठी केलेलं असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता शरद पवारांनी बार्शीत येऊन आपण कधीही सहज बोलत नाही, विचारपूर्वक बोलतो, असं सांगितलं.

 

 

बार्शीतीलच या कार्यक्रमात त्यांनी, आंबेडकर भवन प्रकरणातील वस्तुस्थिती सर्वांसमोर येणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. आंबेडकर भवनावरुन सुरू झालेला वाद मिटला पाहिजे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

 

राज्यसभेसाठी भाजपकडून सहस्त्रबुद्धेंना तिकीट, महात्मेंची सरप्राईज एण्ट्री


 

सत्ताधारी युतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेचा वाद हा नाटकी असल्याचं सांगत हे पक्ष कामही करणार नाहीत आणि सत्ताही सोडणार नाहीत, असं ते म्हणाले.  दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असताना राज्य सरकार पुरेसं गंभीर नाही. दुष्काळ निवारणात फडणवीस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

 

आगामी निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा तूर्त तरी विचार नाही, असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं.

 

पवार काय म्हणाले होते?