पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असताना त्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मराठ्यांना कशाला हवंय आरक्षण असा प्रश्न संभाजी भिडे यांनी केला. त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असं म्हणत शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच भडकले. मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. 


Sambhaji Bhide On Maratha Reservation : काय म्हणाले होते संभाजी भिडे? 


सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले? मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे असं संभाजी भिडे म्हणाले होते.  


शरद पवार भडकले


संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार भडकले. संभाजी भिडे हे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी केला. 


तर राजीनामा देईन, देवेंद्र फडणवीसांचं आव्हान 


राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षण द्यायचं आहे, त्यांना सगेसोयऱ्यांच्या मुद्दा मान्य आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना विरोध आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यावर असं काही सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ आणि राजकारणातून निवृत्त होऊ असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 


या प्रश्नावर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


ही बातमी वाचा: