पुणे : आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवणार आहोत. त्याला दुसरा पर्याय नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र काम करण्याची गरज सुद्धा पवारांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला.


पवार नेमकं काय म्हणाले?

मित्रपक्षांशी बोलून पोटनिवडणुकांबाबत समन्वयाची भूमिका घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले. मात्र आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवणार असून, त्याला दुसरा पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

नाशिक, रायगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा आम्ही मागत आहोत. पदवीधरची जागा देखील आम्ही मागतो आहोत, असे सांगताना पुढे पवार म्हणाले, “यवतमाळमध्ये आमची जागा आणि आमदार असताना मित्रपक्षाने शिवसेनेला सोबत घेऊन आमची जागा पाडली. या पाडापाडीच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांचा फायदा होतो. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र काम करण्याची गरज आहे.”

आज व्होटिंग मशीनबाबत लोकांच्या मनात शंका आहे. निवडणुकीत या मशीनकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवही टीका केली. ते म्हणाले, “यूपीएच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी 71 हजार कोटी रुपये बँकांममध्ये भरले. तर या सरकारने नीरव मोदीसारख्यांना मदत व्हावी म्हणून बँकांमध्ये 86 हजार कोटी रुपये भरले.”

तसेच, देशाचे पंतप्रधानांनी जेव्हा बोलायची गरज असते तेव्हा बोलत नाहीत, असा टोमणाही पवारांनी मोदींना लगावला.