बेळगाव : बेळगावमधील पुणे-बंगळुरु महामार्गावर कार आणि ट्रक अपघातात सात जण जागीच ठार झाले आहेत. श्रीनगर येथील गार्डन जवळील महामार्गावर दुपारी दीड वाजता हा अपघात घडला. अपघातात ठार झालेले सात जण औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.


कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेल्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर कार दुभाजकारून दुसऱ्या बाजूला गेली आणि कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारने धडक दिली.


अपघात इतका भीषण होता कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या सहाही जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासही बरेच परिश्रम घ्यावे लागले. कारमधील पाच जण जागीच ठार झाले होते, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



मृतांची नावे


नंदू पवार, अमोल नेवी, सुरेश कणेरी, अमोल चौरी, महेश पांडळे, महेश चावरे आणि गोपाळ पाटील अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.


अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त बी .एस. लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात सदर अपघाताची नोंद झाली आहे.