मुंबई : ज्येष्ठ विनोदी लेखक,  कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे वयाच्या 95 वर्षी  वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


दत्तात्रय मोराती मिरासदार हे मराठी साहित्य विश्वात द. मा. या नावाने परिचित होते.  विनोदी लिखाणाबरोबरच तेवढ्याच खुमासदार शैलीत कथाकथन करण्यातही त्यांचा हातखंडा होता.  शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह मराठा कथाकथन सर्वत्र लोकप्रिय केलं.  परराज्य आणि परदेशातही द.मांच्या कथाकथनाचे कार्यक्रम झाले.


द. मा.  मिरासदार यांना साहित्य अकादमी पुरस्काराबरोबरच महाराष्ट्र राज्याचा वाङ्मयीन पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. 


द. मा.  मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल, 1927 मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. 1952 साली अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.


मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.


मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.