उस्मानाबाद : राज्यमंत्रिमंडळात कलंकित नेत्यांच्या समावेशावरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं असताना फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो ग्रुपला शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातलेली आहे.


 
कंपनी कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करुन 'लोकमंगल ग्रुप'ने जमवलेली 74.82 कोटी रुपयांची गुंतवणूक ही नियमबाह्य असल्याचं सेबीचं म्हणणं आहे. ही सर्व गुंतवणूक सव्याज परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. तसेच लोकमंगल समुहाकडून झालेला हा घोटाळा सहारा उद्योग समुहासारखा असल्याचं सेबीचं म्हणणं आहे.

 
लोकमंगल ग्रुपने उस्मानाबादच्या लोहारा गावात कारखाना काढण्यासाठी दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे 20 कोटींचं कर्ज घेतल्याचं समोर येत आहे. देशमुखांचं कुटुंब संचालक असलेल्या लोकमंगल समुहाला आपली बाजू मांडण्यासाठी 21 दिवसांचा वेळ देण्यात आला असून जोपर्यंत सर्व संचालक आपल्या डीमॅट खात्यांची विवरणपत्र सादर करत नाहीत तोपर्यंत त्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.