सातारा : सातारा जिल्ह्यातील सासवड गावातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथील गावात पेट्रोलची पाईपलाईनच फोडल्याचं समोर आलंय. एका बाजूला पॅट्रोलचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र चोरट्यांनी अशा पद्धतीने केलेली चोरी म्हणजे सातारा पोलिसांना दिलेले मोठे आव्हानच म्हणावे लागणार आहे. साताऱ्यातील सासवड येथे आठ दिवसांपूर्वीची ही घटना आता समोर आली असून ही घटणेचे गांभीर्य लक्षात घेतो ती गोपनीय ठेवण्यात आली होती.


हिंदुस्तान पॅट्रोल लिमिटेडने मुंबंई ते सोलापूर अशी पेट्रोलची पाईपलाईन केली आहे. ही पाईपलाईन साताऱ्यातील फलटण तालुक्यातील सासवड आदर्की अशा डोंगराळ भागातून नेण्यात आली आहे. ही पाईपलाईन आज्ञात चोरट्यांनी ड्रील करुन त्याला पाईप लावून ती बाहेर काढली. चोरट्यांनी हजारो लिटर पेट्रोल चोरुन नेले. चोरट्यांनी पेट्रोल चोरी केली मात्र ही चोरी करत असताना त्यांना काढलेली पाईप पुन्हा जोडता आली नाही.


 परिसरात पेट्रोलचा वास


त्यामुळे त्यातून हजारो लिटर पॅट्रोल हे परिसरात मुरत गेले. आणि या परिसरातील संपूर्ण शेती ही जळून गेली. परिसरात पेट्रोलचा वास येत होता मात्र तो नेमका कुठून येतो हे शेतकऱ्यांना समजले नाही. परिसरातील लोकांना मात्र या वासाचा मोठा त्रास जाणवत असताना हिंदुस्तान पेट्रोलियमचे कर्मचारी अधिकारीही शोध घेत या परिसरात फिरत होते. अखेर त्यांना ज्या ठिकाणी ही चोरी झाली आहे ते ठिकाण मिळून आले. जेव्हा पाहिले तेव्हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाया चालल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वेळीच पोलिसांना या बाबतची माहिती देत संपूर्ण परिसराला धोकादायक परिसर म्हणून सील केले.



परिसरातील विहिरी सध्या पेट्रोलने तुडूंब भरल्या
दरम्यान या ठिकाणी सुमारे सात ते आठ पाण्याचे टँकर, गळती झालेले पेट्रोल गोळा करण्यासाठी पॉवर ट्रॅकरही मागवण्यात आले. तसेच या संपूर्ण परिसरात मोबाईल वापरासह कुणी शेकोटी करु नये, परिसराला वनवा लावू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला. ही झालेली गळती सध्या पूर्णता थांबवण्यात हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना यश आले असले तरी या हजारो लिटर पेट्रोल हे जमिनीत मुरल्यामुळे आता परिसरातील सर्वच विहिरी सध्या पेट्रोलने तुडूंब भरल्या आहेत. यातील पाण्यासह पेट्रोल टॅंकर लावून काढण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व विहिरीतील उपसा सुरु असला तरी यात पेट्रोल जमा होण्याचे प्रमाण काही अद्याप थांबलेले नाही. या विहिरींमधील मासेही मृत होऊन ते विहिरीवरच तरंगताना दिसत आहेत. विहिरीत मोठ्या प्रमाणात पंट्रोल साठत असल्यामुळे या विहिरींमधील पाणी हे पिण्यालायक राहिलेलं नाही.



शेतकऱ्यांची पिके जळून गेली 


त्याचबरोबर संपूर्ण शेतीही पेट्रोलने भिजल्यामुळे या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची पिके ही जळून गेली आहेत. यात गहु, बाजरी, मका या सारख्या पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांनी केलीय. या बाबत हिदुस्तान पॅट्रोलियमने लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातांविरोधात चोरीचा आणि नुकसान केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसात या घटनेबाबत अद्याप पोलिस कोणालाही पकडू शकलेले नाही. मात्र या चोरीवर एक टीम काम करत असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.