साताऱ्यात अपेंडिक्स शस्त्रक्रिया, मुंबईतील बालिकेचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2018 08:44 AM (IST)
मुंबईतील 12 वर्षीय साक्षी कवळेचं साताऱ्यात अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिचा मृत्यू झाला.
सातारा : अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर 12 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचा प्रकार साताऱ्यात समोर आला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे आपल्या लेकीला प्राण गमवावे लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कराडमधील निकम रुग्णालयात ही घटना घडली. साक्षी कवळे या 12 वर्षाच्या बालिकेचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिचा मृत्यू झाला. कवळे मूळ कराड तालुक्यातील चोरे या गावातील रहिवासी आहेत. मात्र साक्षीचे वडील बीएमसीमध्ये नोकरीला असल्यामुळे कवळे कुटुंब मुंबईला स्थायिक झालं आहे. यात्रेनिमित्त सर्व कुटुंबीय चोरे गावात आले होते. साक्षी मुंबईतील चेंबूरमधल्या अॅटॉमिक एनर्जी सेंटर या शाळेत सहावीत शिकत होती.