सातारा: शेतकऱ्यांची कर्जमाफी, १९ आमदारांचं निलंबन, नोटाबंदी आणि डॉक्टरांचं आंदोलन अशा एक ना अनेक विषयांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.


‘डॉक्टरांचा संप पहिल्याच दिवशी मिटवता आल असता. पण सरकरानं तो मिटवण्यासाठी बराच विलंब लावला. आता डॉक्टरांना पोलीस संरक्षण दिलं. हेच पहिल्या दिवशी केलं असतं तर शेकडो रुग्णांचे जीव वाचले असते.’ असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

'मी उर्जा खात्याच्या मंत्री होतो. काही दिवसांपूर्वी मी त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारल की, वीजेची मागणी किती वाढली? त्यावेळी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की,   महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 8 टक्क्यांनं मागणी कमी झाली आहे. याचाच अर्थ असा की राज्यातील विकास थांबला आहे. तसेच अनेक शहरात बांधकामं थांबली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पैसा गुंतवणं थांबवलं आहे.' अशी टीका करत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

'या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक आश्वासनं दिली. पण ती आजही पूर्ण झालेली नाही. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी आहे. पण या सरकारनं फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरु ठेवलं आहे. गेल्या अडीच वर्ष धनगर समाजाला आरक्षण दिलेलं नाही.' असं म्हणत अजित पवारांनी भाजप सरकारवर टीका केली.

'भाजपनं शिवसेना मंत्र्यांना दिल्लीवारी घडवून आणली. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी काय अद्यापही झालेली नाही. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.' असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यभरात जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असला तरीही सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवली. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीतही सत्ता मिळवली. त्याबद्दल अजित पवारांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही अजित पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.