लोकांनी दारु प्यायची की नाही हे ठरवणारं न्यायालय कोण? : राऊत
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 22 Apr 2017 08:28 AM (IST)
मुंबई : महामार्गांवरील दारुची दुकानं हटवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "लोकांनी दारु प्यायची की नाही आणि महामार्गावरील 500 मीटर अंतरावर दारुची दुकानं हवी की नको हे ठरवणारं न्यायालय कोण?" असा सवाल राऊत यांनी केला आहे. नाशिकमध्ये कार्यक्षम आमदार पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, "लोकांनी दारु प्यायची की नाही हे सरकार ठरवेल, न्यायालय कोण ठरवणार? आणि किती मीटरमध्ये हे तुम्ही कोण ठरवणार? तसं असेल तर न्यायमूर्तींचे जे क्लब आहेत ना सगळे, सरकारी अनुदानाने मिळणारे, ते आधी बंद केले पाहिजेत. तुम्ही सोईसवलती मिळवता आणि तुम्ही लोकांच्या जीवनातला आनंद नष्ट करता? थोडा तरी आनंद असू द्या, लोकशाहीमध्ये. अहो, तुम्हाला माहित आहे का, हे न्यायालयं आता राज्यकर्ते झाले आहे. इतकं पण राजकारण त्यांनी करु नये. निवडणुका लढा हिम्मत असेल तर. ज्याने निर्णय दिले आहेत ना अशाप्रकारचे, त्यांनी राजीनामा द्यावा. लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवली पाहिजे. त्यांना किती मत पडतात, ते कळेल." पाहा व्हिडीओ