भाजपाकडून शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आल्याच्या बातमीवर संजय राऊत म्हणाले,भाजपाकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच आता ऑफर देण्याची वेळ निघून गेली आहे. दिल्लीतील मोठ्या नेत्यांना वाटलं सत्ता आणि ताकदीच्या जोरावर महाराष्ट्राची राजकीय कुंडली बदलता येईल पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता ही दिल्लीला चालवता येणार नाही. राज्यात सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ती लवकरच पूर्ण केली जाईल.
राज्याला आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व आहे. परंतु आघाडी सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावं, अशी तिन्ही पक्षांची इच्छा आहे आणि ते जनतेच्या भावनांना मान देतील, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात भूमिका घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट असो वा काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी चर्चा, सगळीकडे संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडली. विशेष म्हणजे विरोधक असूनही राऊतांनी शरद पवारांचा विश्वास कमावला. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी पवारांची राऊतांना पसंती असल्याचं कळतं.
सत्तास्थापनेआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज, शुक्रवारी ठरलेल्या बैठकीआधी गुरुवारी (21 नोव्हेंबर) उशिरा बैठक झाली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेचा निर्णय आता जवळपास निश्चित झाला आहे. यासाठी आज, शुक्रवारी महाविकासआघाडीची बैठक आयोजित केली आहे. मात्र या नियोजित बैठकीआधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले. या बैठकीत नेमक काय घडलं याबाबत माहिती मिळाली नसली तरी ही बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत राऊत यांनी दिले.