मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावरुन काल ज्यांनी संसदेत थयथयाट केला ते आयपीएस संजीव भटांच्या पत्रावर नाचणार का असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला केलाय. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणारे संजीव भटांचे पत्र भाजपने समोर आणावं आणि त्याचा तपास करावा असंही आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. 


काल संसदेत बोलताना भाजप नेत्यांनी महाराष्ट्तील सरकार बरखास्त करावं अशी मागणी केली होती. एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी आपल्या पत्रातून सरकार, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात असं सांगत भाजप नेत्यांनी संसदेत गोंधळ घातला होता.


खासदार संजय राऊत म्हणाले की, "ज्या एक पत्रावरून भाजपचे लोक थयथयाट करत आहेत त्यांनी गुजरातमधील आयपीएस संजीव भट यांनी लिहलेले पत्र जे नंतर उघड करावं. भाजपने त्या पत्राच्या आधारावर गुजरात सरकार का बरखास्त केलं नाही? काल जे थयथयाट करत होते ते हे पत्र आल्यावर आज नाचणार का?"


संजय राऊत पुढे म्हणाले की, "रविशंकर प्रसाद हे कायदा मंत्री आहेत. गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातच्या सरकारवर आरोप करणारे पत्र लिहिले होते. त्या आधारावर गुजरात सरकारच्या पूर्व मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली का? संजीव भट यांनी केलेले आरोप जास्त गंभीर होते. त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. गुजरातमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय द्यायचा का?"


संजय राऊत म्हणाले की, "संजीव भट यांनी केलेल्या आरोपांबाबत तपास करावा अशी मागणी मी देशाच्या कायदा मंत्र्यांकडे करतो. काल लोकसभेत जे नाचत होते 
त्यांनी संजीव भट यांचं पत्र समोर आणावं आणि त्यावर कारवाईची मागणी करावी."


गुजरातमधील माजी पोलीस अधिकारी संजिव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. 


मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्यात यावी यासाठी परमबीर सिंह यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, परमवीर सिंग कोर्टात गेले ही चांगली गोष्ट आहे. राज्यसभेत रंजन गोगाई आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टात न्याय मिळत नाही असं वक्तव्य केलं होतं. या दबावाचा वापर करून परमवीर सिंग यांना काम करून घ्यायचं असेल तर ते न्यायालयात जाऊ शकतात. ईडी, सीबीआय ,सुप्रीम कोर्ट यांचा राजकारणासाठी वापर केला जातो हे राजन गोगाई यांचं म्हणणं आहे, त्यांच्यावर मी विश्वास ठेवतो


परमवीर सिंग राज्य सरकारवर दबाव आणत असतील तर सरकारने त्याचा विचार करावा असंही संजय राऊत म्हणाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायचा आदेश दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्याना पत्र लिहलं होत. यावर गृहमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार ही चर्चा सुरु होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट केलं.


खासदार संजय राऊत म्हणाले की, "राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फरक नाही. पवार साहेबांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी जी भूमिका मांडली ती सरकारची भूमिका आहे. अशा पांचट पत्रावरून गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचे राजीनामे घेतले तर कुणाही राज्य करु शकणार नाही. आमच्याकडे पण गुजरात मधील पत्र आहेत ती रविशंकर प्रसाद याना पाठवू."


संबंधित बातम्या :