Sanjay Raut Press Conferance : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात टार्गेट दिलं जातंय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गोव्याच्या विजयाचे शिल्पकार जरी म्हटलं गेलं असलं, तरी  गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही, तिथं व्यक्तीच जिंकते आणि त्या व्यक्ती सरकार बनवतात, असंही ते म्हणाले आहेत. त्यासोबतच शरद पवारांबाबत निलेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुनही राऊतांनी समाचार घेतला आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "गोव्यात भाजपच नव्हे तर कोणीही असलं तरी वाद निर्माण होतो. गोव्यात निवडणुका जिंकल्याचा कोणीही टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार असल्याने भाजप कार्यालयात त्यांचं मोठं स्वागत झालं, ढोल वाजवले, लेझीम खेळले. विधानभवनातही त्यांचं मोठं स्वागत झालं. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही. गोव्याचं राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात." 


 लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी-विरोधकांनी हातात हात घालून काम करायला हवं : संजय राऊत


संजय राऊत म्हणाले की, "सरकारबरोबर हातात हात घालून राज्याचे आणि देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही बाजुंनी सकारात्मक भूमिका घेऊन काम करणं हे लोकशाहीमध्ये महत्त्वाचं असतं. दुर्दैवानं गेल्या सात-आठ वर्षांपासून हे पाहायला मिळत नाही. म्हणजे, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकमेकांचे शत्रू आहेत. एकमेकांशी पराकोटीचं वैर आहे, महाभारत आहे कौरव-पांडवांचं, अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात. हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी चांगलं नाही. पण आमचा प्रयत्न राहिल की, राष्ट्राच्या, सुरक्षेच्या, आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर जास्तीत जास्त एकमत करुन सभागृहाचं कामकाज पुढे नेण्याचं."


पाहा व्हिडीओ : गोव्यात निवडणुका जिंकल्याचा कोणीही टेंभा मिरवू नये : संजय राऊत 



भाजपला विजयाचा उन्माद अजीर्ण होऊ नये : संजय राऊत 


"अनेक मुद्दे निवडणुकांपूर्वी जिवंत केले जाता. जसा हिजाबचा मुद्दा होता. या मुद्द्यांनी निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत. अलिकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच आपण भर देतो. निवडणुका त्यावरच लढवल्या जातात. निवडणुका झाल्यानंतर विकासावर बोलायला सुरुवात होते. पाच वर्षांनी पुन्हा जुन्या मुद्द्यावर येतात. आता देशाला सवय झाली आहे. आणि लोकंही गंगेत जशी प्रेतं वाहून गेलीत, त्याप्रमाणे वाहून जाताना दिसत आहेत. हे चित्र देशासाठी चांगलं नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "चार राज्यांत भाजप जिंकला आहे, एका राज्यात आप जिंकली आहे. हा विजयाचा उन्माद अजीर्ण होऊ नये. हा विजय सत्कारणी लागावा, एवढंच आम्ही म्हणून शकतो. या देशात विरोधी पक्ष राहणं ही या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे." 


देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात : संजय राऊत 


सामनामधून मोदींचं कौतुक केल्यानंतर भाजप नेत्यांकडून यासंबंधी सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात हे त्यांना समजायला हवं. त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना गुडघ्यापेक्षा खुजं करुन टाकलं आहे. हे मी आता म्हणत नसून अनेक वर्षांपासून सांगत आहे. मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच आहे, पण भाजपने त्यांना खुजं करुन टाकलं आहे. ते फक्त आमचेच पंतप्रधान आहेत, आमच्याच पक्षाचे आहेत, पक्षातल्या एका गटाचे आहेत असं वातावरण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी निर्माण केलं असून करतही आहेत"


"पंतप्रधान देशाचं नेतृत्व करत असून एका पक्षाचं नाही. पंतप्रधानांची गेली काही भाषणं ऐकली तर त्यांनीही या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं. मी देशाचा नेता आहे असं त्यांनी स्वत:ला बजावलं पाहिजे." असंही त्यांनी सांगितलं. "यामध्ये सर्वात जास्त समावेश महाराष्ट्रातील नेत्यांचा आहे. त्यांनाही आपण महाराष्ट्रातील नेते आहोत हे समजलं पाहिजे. पण काही लोकांना मोठेपण मिळालं असेल तर ते टिकवता येत नाही, त्याची प्रतिष्ठा वाढवता येत नाही." असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.