'ते' कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 04:36 PM (IST)
नवी दिल्ली : 'सामना'मधील कार्टून वादावर अखेर मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडलं आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, 'ते' कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही, त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी बिनशर्त माफी मागितली आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही, असं म्हणत राऊत यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे 'सामना'मधून गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली जात आहे. गरीब मराठा समाजाबाबत सहानुभूती बाळगा, असं मत 'सामना'तून व्यक्त केलं जात होतं. एखादा कायदा दुसऱ्या समाजासाठी अन्यायकारक ठरत असेल, तर काळानुसार कायद्यात बदल व्हायलाच पाहिजेत, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आरक्षण मिळावं अशी भूमिकाही त्यांनी घेतली. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची मागणीही राऊत यांनी केली. प्रभूदेसाईंनी बिनशर्त माफी मागितली 'सामना'तील कार्टून प्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाईंनी बिनशर्त माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही. काही गोष्टी अजाणतेपणे घडतात, चूक ही चूक असते, मात्र किती ताणायचं हा प्रश्न आहे. माफी मागितली की प्रश्न संपला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले. माथी भडकवण्याचे विरोधकांचे उद्योग महाराष्ट्रात अस्थैर्य निर्माण करण्याचे, लोकांची माथी भडकवण्याचे विरोधकांचे उद्योग सुरु आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला. आघाडीच्या काळात अॅट्रॉसिटीच्या सर्वाधिक घटना, तेव्हा तुम्ही शांत का होता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ती दगडफेक म्हणजे काही हल्ला नाही सामनाच्या कार्यालयावर झालेली दगडफेक म्हणजे काही हल्ले नव्हते, त्याला आम्ही हल्ला मानत नाही, हल्ला काय असतो हे आमच्याकडून शिकावं, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला. हल्ला झाला असता, तर हल्लेखोर दिसले नसते, दोन दगड लांबून मारणाऱ्याला हल्ला म्हणत नाहीत, असंही राऊत म्हणाले. शिवसेना खासदारांमध्ये नाराजी नाही शिवसेनेच्या खासदार, आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या अफवा आहेत. जातीची लेबलं पाहून पक्षात कोणालाही पदावर ठेवलं जात नाही. शिवसेना हा जातविरहित पक्ष आहे. बहुजनांसह सर्वांना या पक्षात सामावून घेतलं आहे, असंही राऊत म्हणाले. पाहा संपूर्ण मुलाखत :