नागपूर : निवडणुकीत हाकमांडची पाहिजे तशी साथ मिळाली नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. नेत्यांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याचं वक्तव्य त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.


वडेट्टीवार म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत हायकमांडकडून पाहिजे तशी साथ मिळाली नाही. आम्ही ज्या सभा मागितल्या त्या मिळाल्याचं नाहीत असेही वडेट्टीवार म्हणाले. स्वपक्षाच्या एका मोठ्या नेत्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, आता नाव सांगत नाही, पण त्यांनी आम्ही म्हणत असतानाही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे विदर्भात थेट 10 जागांचे नुकसान काँग्रेसला झाले असल्याचे ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेना भाजपचा लोकांसमोर तमाशा सुरु आहे. चर्चा केली तेव्हा मातोश्रीसमोर किंवा वर्षाच्या चौकात खुर्च्या मांडल्या नव्हत्या, मग आता कशाला लोकांना फिफ्टी फिफ्टी सांगता? असा सवाल करत लोकांनी तुम्हाला मतदानातून आदेश दिला आहे, चुपचाप सरकार स्थापन करा, असेही ते म्हणाले.

हे भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी नसून, फक्त पदासाठी सर्व सुरू आहे. सरकार पाच वर्षांसाठी आहे, मुख्यमंत्री अडीच वर्षे नसावा. आम्ही विरोधातच आहोत. कर्नाटक प्रयोग करण्याची स्थिती नाही, असेही ते म्हणाले. लोकांनी आम्हास विरोधी पक्ष म्हणून जनादेश दिला आम्ही विरोधात बसू, विरोधी पक्ष नेतेपद आता राष्ट्रवादीकडे असेल, असेही ते म्हणाले.

नितीन गडकरी ह्यांना डावलल्यामुळे देवाने भाजपाला फटका दिला. त्या माणसाने तुमचा पक्ष इथे मोठा केला. जर गडकरी समोर असते तर भाजपच्या जागा कमी झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले. जर उद्धव ठाकरेंच्या विरोधात ईडी वगैरे वापरून सत्ता वाचवण्यासाठी दबाव तयार केला तर जनता ह्यांना रस्त्यावर उतरून मारेल, असेही ते म्हणाले.

आमचे आता मातीतील पहिलवान निवडून आले आहेत, एकही तेल लावलेला नाही, असे देखील ते म्हणाले.