मुंबई : 'शेर कभी घास नही खाता' या वनमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार? या प्रश्नावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'शेर कभी घास नही खाता' असे उत्तर दिले होते. त्यावर काश्मीरमध्ये भाजप नावाच्या वाघाने काय खाल्लं? मेहबूबा मुफ्ती यांना आता अटक करण्यात आली आहे. पण त्याच मेहबूबा मुफ्तींबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं होतं, असा आरोप राऊत यांनी केला. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलत होते.


पीडीपी बरोबर जाऊ नका राष्ट्राच्या सुरक्षेसाठी घातक आहे हे आम्ही सांगत होतो तरीही भाजपाने सरकार बनवलं. त्यावेळी भाजपा नावाच्या वाघाने काय खाल्लं? होतं असा सवाल राऊत यांनी केला. काय खायचं काय फेकायचा हे आम्हाला कुणी शिकवू नका. आम्हाला राजकीय बाळकडू शिकवू नये, असेही ते म्हणाले. दरम्यान वाघ अग्रलेख लिहून गुरगुरणार असेल तर मी वनमंत्री आहे. वाघाचे संवर्धन आणि संरक्षण करणं मला माहित आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. सत्ता स्थापनेबाबत काही तोडगा निघाला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यावर हा इशारा म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, असे राऊत यांनी म्हटलं होतं.

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण : संजय राऊत  

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आज ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आता महाराष्ट्रातील आता कुठल्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण यांनी केले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, या राजकारणामुळे राज्यातील जनतेने विरोधात बंड केले आणि निकालाचे आकडे बदलले. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा आकडा मिळाला हे त्यांचंच फलित आहे. निवडणुकीआधी पाच आमदार ही निवडून येणार नाहीत असं चित्र तयार केलं गेलं होतं मात्र त्या पक्षाला आज पूर्वीपेक्षाही चांगल्या जागा मिळाल्या, असे ते म्हणाले. विशेषतः शरद पवारांबाबत ईडीची नोटीस प्रकरण घडायला नको होती, असेही ते म्हणाले.

भाजपचं राज्यातील नेतृत्व फेल, दिल्ली हायकमांडचेही दुर्लक्ष, संजय राऊतांचा हल्लाबोल 

दरम्यान 'हीच ती वेळ, आता नाहीतर कधी नाही' असे म्हणत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असेही ते म्हणाले. तरुणांनी नेतृत्व केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ते स्वत: सकारात्मक असल्याचे संकेत दिले. मात्र मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा उद्धव ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले.