नाशिक : आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. आर्थिक मंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे रशिया सारखी परिस्थिती होऊ नये. आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात. काँग्रेस काळात देखील मोठी मंदी आली होती. मात्र मनमोहन सिंह यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं होतं अशा शब्दात त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारचं  कौतुक केलं.


यावेळी ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे. शिवसेनेमध्ये मुलाखत होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात, असे ते म्हणाले. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुका लागतील. राज्यातील राजकारणात सध्या उत्तर महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा केली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी स्वतः काल मी आहे तिथे बरं आहे असं वक्तव्य केल्याने चित्र स्पष्ट झालं आहे. सगळ्यांना आमच्या पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत, असे ते म्हणाले. भाजप राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे.  आम्ही देखील तयारी करत आहोत, असेही ते म्हणाले.


याआधीही राऊत यांनी मंदीवरून साधला आहे निशाणा

याआधीही त्यांनी देशातील आर्थिक मंदीकडे आणि बेरोजगारीकडे सरकारचं लक्ष नसल्याचा आरोप केला होता. सत्तेत असलो तरी सरकारच्या कमकुवत आर्थिक धोरणांवर टीका करणारच असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. ऑटोमोबाईल सेक्टर, लहानमोठे उद्योगधंदे धोक्यात आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. लोकांना जीएसटी काय, नोटबंदीमुळे काय झालं याच्याशी घेणं-देणं नाही. त्यांना त्यांची रोजीरोटी महत्वाची आहे. सरकारच्या कोणत्याही निर्णयानं जर रोजगार जात असेल तर असा निर्णय लोकांच्या दृष्टीनं घातकच आहे, असा आरोपही राऊत यांनी केला होता.  महाराष्ट्रातल्या उद्योगांवरही मोठं आरिष्ठ आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका घेतली पाहिजे. बाहेरच्या राज्यातले उद्योगधंदे ठप्प होत आहेत. तिथले लोंढे महाराष्ट्रात येतील त्याचं तुम्ही काय करणार? असा सवालही त्यांनी केला होता.