मुंबई : काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेना मंत्री रविंद्र वायकरांवर भ्रष्टाचार आणि जमीन हडपल्याचे आरोप केल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा सनसनाटी आरोप केला आहे. रायगड मुरुड परिसरात मातोश्री आणि वायकर यांनी मिळून
900 कोटींची जमीन खरेदी केल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.


 
मुरुड परिसरात उद्धव ठाकरे आणि वायकर यांच्या पत्नी मनिषा यांच्या नावे साडेचारशे एकर जमीन खरेदी केली आहे. रविंद्र वायकरांची पत्नी मनिषा वायकर आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांच्या नावे रायगडच्या कोलई गावात साडेसहा लाख स्क्वेअर फूट जमीन आहे.

या जमिनीसाठी पैसा कुठून आला याची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे. तसंच विजयालक्ष्मी इन्फ्रा कंपनीत वायकर स्वत: संचालक आहेत. हीच कंपनी एसआरए प्रोजेक्टची कामे करत असल्याचं निरुपम यांचं म्हणणं आहे.

 

महिन्याभरापूर्वी केलेल्या आरोपांवेळी वायकरांनी दिलेली प्रतिक्रिया :

 

भ्रष्टाचाराचे आणि जमीन हडपल्याचे आरोप करणाऱ्या निरुपम यांनी जाहीर माफी मागितली नाही तर कारवाईला तयार राहावं असा इशाराही वायकरांनी दिला होता. आपण शस्त्रक्रियेसाठी परदेशी गेलो असता बिनबुडाचे आरोप करुन संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं, ज्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आणि मानसिक त्रासही झाला, असं वायकरांनी म्हटलं होतं .

 

 

वायकरांचा निरुपम यांच्यावर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा