Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सुत्रांनी माहिती दिली  आहे.


मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करुन कळवतो असे सांगितलं आहे.


शिवसेनेकडून या नावांची चर्चा


दरम्यान, शिवसेनेनं राज्यसभेची सहावी जागा लढवण्यासाठी  हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून चार माजी खासदाराची नावं चर्चेत आहे. चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हे चारही नेते गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळं एकाला राज्यसभेवर संधी देण्याचा शिवसेनेचा विचार आहे. दरम्यान, अपक्ष म्हणून राज्यसभेच्या रिंगणात उतरलेले छत्रपती संभाजीराजे यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची चिन्ह शक्यता वर्तवली जात आहे.


सहाव्या जागेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता 


राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत, त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यात राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे. त्यात शिवसेनेनं आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. दुसरीकडे भाजपही सहाव्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं जर हा उमेदवार रिंगणात उतरवला तर फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळू शकतं. त्यामुळं सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.


पक्षीय बलाबल


सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटकेचं निधन झाल्यानं ती संख्या 168 आहे. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 168  आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत.  संख्याबळानुसार शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. 


महत्वाच्या बातम्या: