तुळजापूर: कोपर्डीच्या घटनेनं राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच घुसळून निघतं आहे. लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या मराठा मोर्चेकरांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. मराठा समाजाच्या ऐतिहासिक मोर्चांमुळे सरकारभोवतीही प्रश्नांचं मोहळ तयार झालं आहे.


राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपतींनी यांनी मोर्चांबाबत आपल्या मनातील अनेक गोष्टी उघड केल्या. संभाजीराजेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.

'पुढाऱ्यांना दूर ठेवून मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी'

'माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालं. मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य करण्याची सरकारची तयारी आहे. एक विशेष कॅबिनेट बैठक रायगडावर घ्या. त्यातून योग्य तो मेसेज जाईल. समाजातल्या नेत्यांना नव्हे. काही अभ्यासूंना सोबत घेऊन चर्चेची कोंडी फुटू शकते.' असं म्हणत संभाजीराजेंनी पुढाऱ्यांना चर्चेपासून दूर ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

'...म्हणून मराठा समाजाचं नेतृत्व धास्तावलं आहे'

'मी भाजपचा सदस्य नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. मी पक्षाचं सदस्यत्व घेणार की नाही हे अद्याप ठरलेलं नाही. सध्या स्वंयस्फुर्तीनं निघणारे मोर्चे पाहता मराठा समाजाचं नेतृत्व धास्तावलं आहे.' असं म्हणत संभाजीराजांनी पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

'राज्यसभेत कोपर्डीचा प्रश्न पहिल्यांदा मी विचारला

'राज्यसभेत कोपर्डीचा प्रश्न पहिल्यांदा मी विचारला, राज्यसभेत मराठा आरक्षणाचा ठराव देखील मी मांडणार आहे. आजवर मराठा समाजातील नेते प्रश्न सोडवण्यात कमी पडले. मराठा समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून साचत गेले आहेत. त्यामुळेच हे मोर्चे निघत आहेत.' असंही संभाजीराजे म्हणाले

'अॅट्रासिटीचा दुरोपयोग होतो हे वास्तव'

अॅट्रासिटी कायद्याचा दुरोपयोग होतो हे वास्तव नाकारता येणार नाही. पण म्हणून हा कायदा रद्द करणं ही बाब चुकीची आहे. हा कायदा थोड्याफार प्रमाणात शिथील करणं गरजेचं आहे.

पवार साहेबांबद्दल मला कायमच आदर!

शरद पवार साहेब हे देशातील मोठे नेते आहेत. ते काही जरी बोलले तरी त्यांच्याबद्दल मला कायमच आदर आहे. असंही संभाजीराजे म्हणाले.

VIDEO



संबंधित बातम्या:
सरकारी अनास्था हेच मराठा उद्रेकाचं प्रमुख कारण: शरद पवार

आरक्षण मागणाऱ्यांना लग्नावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं: अजित पवार