नांदेड :  जम्मू काश्मीरमध्ये दहशतावद्यांशी दोन हात करताना महाराष्ट्राचा आणखी एक वीरपुत्र शहीद झाला आहे. संभाजी यशवंत कदम असं या जवानाचं नाव असून, ते 35 वर्षांचे होते.


संभाजी कदम हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी होते.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत. मात्र भ्याड हल्ले करुन दहशतवादी प्रत्येकवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

याच दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना संभाजी कदम धारातीर्थी पडले. संभाजी कदम यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि 3 वर्षांची एक मुलगी आहे.

संभाजी यांना 2 बहिणी असून त्या दोन्हीही विवाहित आहेत.

आज सकाळी जम्मूच्या उपनगराबाहेर असलेल्या 166 क्रमांकाच्या युनिटवर 3 ते 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला.
त्यानंतर भारतीय जवानांनीही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ज्यात 4 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.