Ashadhi Wari Pandharpur News : आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा जवळ आला आहे. लाखो वारकरी पालख्यांच्या सोबत पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. या सोहळ्यानिमित्त प्रशासनाने पंढरपूर शहरात 16 ते 20 जुलै या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री तसेच प्राणी कत्तल यावर बंदी घालण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन इथापे (Sachin ithape) यांनी दिले आहेत. 


आषाढी यात्रा कालावधीत 18  ते 20 लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी शहरात येत असतात. यामुळं शहरातील कायदा व सार्वजनीक सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 चे कलम 144 अन्वये दिनांक 16 ते 20 जुलै 2024 या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं 16 ते 20 जुलै या काळात मांस विक्री करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे.



17 जुलै रोजी आषाढी एकादशी 


यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी होत असून यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. यावर्षी प्रथमच भंडीशेगाव , वाखरी या पालखी मार्गावरील इमारती , झाडांना आकर्षक विद्युत रोषणाई करून लाखो भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर पालखी सोहळे पंढरपुरात पोचल्यावर इसबावी , कॉलेज चौक , चंद्रभागा वाळवंट , भाविकांचे निवासस्थळ असणारे 65 एकरावरील भक्तिसागर अशा विविध ठिकाणी हे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यासाठी विविध जागांची पाहणी केली असून पालखी सोहळे येण्यापूर्वी ही विद्युत रोषणाई पूर्ण केली जाणार आहे. 


आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ


दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून संताच्या पालख्या तसेच विविध ठिकाणच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी देखील पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या आहेत. सर्वत्र ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा गजर सुरु आहे. वारकरी हरीनामात तल्लीन असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. दरम्यान,आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं सर्व तयारी सुरुअसल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारचे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे.