पुणे: आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बुधवारी पुण्यात मुक्कामी होती. पुणे शहरातील भवानी पेठेतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या पालखीचे दोन मुक्काम असतात. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. विशेष म्हणजे आळंदी ते पंढरपूर हे अंतर पार करणे म्हणजे वारकऱ्यांच्या समोर असलेलं फार मोठं आव्हान मानलं जातं कारण, वारीसाठी आळंदी आणि पंढरपूरमधील अंतर हे सर्वात जास्त आहे. पुणे ते सासवड या मार्गात एक अवघड असा दिवे घाट लागतो.


शुक्रवारी प्रस्थान करणार असणाऱ्या पालखीसाठी वरुणराजादेखील वारकऱ्यांवर आनंदी झाला आहे, कारण आज पुण्यात चांगलाच पाऊस पडला. उद्या हाच पाऊस झेलत वारकरी दिवेघाट कसा पार करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा दुसरा मुक्काम नाना पेठेतील निवडुंग विठ्ठल मंदिरामध्ये आहे. देहूवरुन तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान केल्यानंतर दोन दिवस या पालखीचा मुक्काम पुणे शहरातच असतो. शुक्रवारी सकाळी तुकाराम महाराजांची पालखीदेखील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबतच हडपसरपर्यंत जाणार आहे, त्यानंतर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम हा लोणी काळभोर येथे असणार आहे.