बडोदा : बडोदामध्ये आयोजित 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असहिष्णुतेविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एल्गार पुकारला आहे. 'राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे' अशा शब्दात गुजरातच्या भूमीवर देशमुखांनी कान टोचले.


'देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कारवापसीचा मार्ग काही लेखकांनी स्वीकारला. त्यामागील त्यांची भूमिका शासनानं मोठ्या मनानं समजून घ्यायला हवी होती. आधुनिक-सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असतं, असायला हवं. भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. तुम्ही या अर्थाने लोकशाहीचं तत्त्व पाळत नाही आहात. म्हणून मी असं म्हणण्याचं धाडस करतो की राजा तू चुकत आहे! तू सुधारलं पाहिजे.' असं लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले.

देशमुख यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पुरस्कार वापसी, दाभोलकर-पानसरे हत्येतील तपासात झालेली दिरंगाई यासारख्या विषयांवर भाष्य केलं. सत्ताधारी भाजपचा थेट उल्लेख टाळत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केले.

बडोद्यात 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन


आजचे सरकार ज्या सावरकरांना मानते, त्यांची विज्ञाननिष्ठा त्याने स्वीकारलेली नाही. सावरकरांनी ‘गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे’असं म्हटलं होतं. आज तिला पूज्य मानत गोहत्येच्या नुसत्या संशयावरुनही माणसांना मारलं जात आहे आणि गोपालन हा अतार्किक श्रद्धेचा विषय ठरवत माणसांना हिंसक केलं जात आहे, अशी टीका देखमुख यांनी आपल्या भाषणात केली.

'राष्ट्रवादाच्या नावाखाली काही जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. काहींच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेतली जात आहे. गांधीजींच्या वचनांचा आधार देत ते म्हणतात, देशभक्ती व राष्ट्रवाद आणि माणसुकी-मानवता वेगवेगळ्या नाहीत. म्हणून राष्ट्रवादी हा सर्वसमावेशक असतो. तो कुणा गट, पक्ष, वंशाला वगळत नाही. आज याविरुद्ध घडताना दिसत आहे. म्हणून माझी चिंता मी या मंचावरुन व्यक्त करीत आहे. समझनेवालों को इशारा काफी है' असं लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले.