उस्मानाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात बैठक होऊन समिती नेमण्यात येऊन मला अल्टिमेटम दिल्याचे वर्तमानपत्रातूनच समजले. मात्र, आपण नेहमीच युद्धासाठी सज्ज असतो, असे म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.


एखादे काम करताना मला अल्टिमेटमची कधीच गरज लागत नाही. अल्टिमेटमपूर्वी काय करावे लागते, ते सर्व अगोदरच करतो, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

वैचारिक पातळीवरील मतभेद मिटवता येतात. पण व्यक्तीद्वेष कसा मिटवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींना आत्मक्लेष झाला नसून ‘सदाभाऊक्लेष’ झाला आहे, असा थेट निशाणा सदाभाऊंनी राजू शेट्टींवर साधला आहे.

शिवाय, “स्वीय सहाय्यक आणि चळवळीत कोणतेही योगदान नसणाऱ्यांनी संघटनेत दुषित वातावरण केले आहे. सरकारमध्ये मंत्री म्हणून करताना आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच वर्षभर काम केले आहे. मात्र, काहींना आपणास केंद्रबिंदू मानून काम करावे असे वाटत होते. मात्र, मी तसे करू शकत नाही, याबद्दल मी माफी मागतो.” असे सांगत सदाभाऊंनी, आपण त्यांच्या भावनांचा आदर करतो. मात्र आपण शेतकरी हितालाच प्राधान्य देणार टोलाही लगावला.

राजू शेट्टींचा सदाभाऊंना अल्टिमेटम

सदाभाऊ खोत यांच्याबाबत पुण्यात पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे या तक्रारींबाबत सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.