मुंबई : ‘मी युतीमुळे मंत्री झालो, तुम्हीपण खासदारकी युतीतून मिळवली. मग तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या मग मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो.’ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी असा थेट हल्लाबोल करत खासदार राजू शेट्टी यांना आव्हान दिलं. मुंबईत ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 16 लोकांची मसुदा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्तानं 30 सप्टेंबरला दसऱ्याच्या दिवशी इचलकरंजीमध्ये मेळावा घेतला जाणार आहे. अशी माहितीही सदाभाऊ खोत यांनी दिली.

यावेळी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. युतीमुळे तुम्ही खासदार झाला. मग तुम्ही राजीनामा देणार का? असा सवलाही त्यांनी विचारला. ‘आपलं अस्तित्व कमी होईल या भीतीने माझ्यावर सरकारमधून बाहेर पडण्यासाठी दबाव निर्माण केला गेला.’ असा दावा खोत यांनी केला.