सांगली : राजू शेट्टींप्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे. तसेच आम्ही फालतू माणसं होतो, पण आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली आणि तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय, असा टोलाही खोत यांनी शेट्टी यांना लगावला आहे.


दूध दरावरून सोलापूरमध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला खोत यांनी उत्तर देताना पलटवार केला आहे. इस्लामपूरमध्ये आमदार फंडातून सुरू झालेले राज्यातील पहिले फिरते क्वारंटाईन सेंटर आमदार सदाभाऊ खोत यांनी सुरू केले, यावेळी खोत बोलत होते.

दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही, अशा शब्दात टीका केली होती.

आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, 'हे काजू शेट्टी' तर शेट्टी म्हणाले, 'खोत भ्रमिष्ट झाले'

या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही, शिवाय शेतकऱ्यांना सरासरी 34 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. आता शेतकऱ्यांच्या या साऱ्या प्रश्नावर सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. महायुतीही आंदोलन करत आहे. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना पण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आली आहे. पण आता संघटनेच्यानेत्यांनी शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे, असं मला वाटतं, त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावं, असं खोत म्हणाले.

BLOG | सत्तेपायी मैत्री तुटली! या राजकारणाने चळवळीचा इस्कोट केला!


खोत म्हणाले की, ठीक आहे, आम्ही फालतू माणसं होतो पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली. त्यामुळे तुम्ही आमदार, दोनवेळा खासदार होऊ शकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते बनवून तुम्ही राज्य करू शकला. पण मला त्यांच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. मला वाटतं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असेल तर सदाभाऊचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धीच्या झोतात राहू शकत नाहीत, असे वाटत असेल. त्यामुळेच अशा भंपक माणसाविषयी फार बोलावे, अशी माझी इच्छा नाही. त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा, सदाभाऊच्या विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून चार वर्षे बाकी आहेत. 2024 ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो, असा इशारा खोत यांनी दिला आहे.