मुंबई: राज्यातील दोन तरुण नेते सध्या ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात ट्विटरवर चांगलेच शाब्दिक 'वॉर' रंगले आहे. या वादाची ठिणगी पडली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर.


कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. त्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी साखर उद्योगाला आजवर देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'साखरेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आतापर्यंत किती पैसे खर्च झाले ह्याचे ऑडिट व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.


साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

निलेश राणे यांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. 'पवार साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असतात. पंतप्रधान मोदीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी', अशा शब्दांत रोहित पवार यांनी निलेश राणे यांना उत्तर दिलं.


मात्र हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. रोहित यांच्या या ट्विटनंतर निलेश राणे चांगलेच भडकले. रोहित यांच्या ट्विटला उत्तर देताना निलेश राणे यांनी 'मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी', असा पलटवार केला. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये निलेश यांनी रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे? असा सवाल करत मुंबईत राहून ठाकरे काही करु शकले नाहीत, असं देखील राणे यांनी म्हटलंय.



यानंतर आता रोहित पवार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.