Republic Day 2021 देशाच्या प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीतील राजपथावर पार पडणारं पथसंचलन हे फक्त भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक आकर्षणाचा विषय आहे. देशाच्या सैन्यबळासोबतच इथं पथसंचलनामध्ये भारतातील अनेक संस्कृतींचंही दर्शन होतं. यंदाच्या वर्षीसुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं. देशातील विविध राज्यांनी चित्ररथांच्या माध्यमातून सुरेख असं सादरीकरण राजपथावर केलं. यामध्ये महाराष्ट्रही मागे नव्हता.


संतांची आणि शिवबांच्या शूरवीरांची भूमी असणाऱ्या या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथामध्ये यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 'संतवाणी'चा प्रभाव पाहायला मिळाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, अशा जयघोषात हा रथ राजपथावर आला आणि अनेकांचेच चेहरे खुलले. संतांची अविरत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची एक सुरेख झलक या चित्ररथावर पाहायला मिळाली.


चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महारांजाची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मुर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ दाखवण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फुट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत.








Republic Day 2021 | दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांचा खात्मा, मरणोत्तर अशोकचक्रने सन्मानित शहीद मेजर मोहित शर्मा यांची शहारा आणणारी कहाणी


चित्ररथ आणखी निरखून पाहिल्यास महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या असणा-या विठुरायाची कटेवर हात असणारी 8.5 फुट उंचीची लोभस मूर्ती नजरी पडते. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे आणि यावर संतांची सुवचनं लिहण्यात आली आहेत. अतिशय सुरेख अशा या चित्ररथाला पाहताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संतसंपदा नेमकी काय, याचीच प्रचिती येत आहे.