मुंबई: प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे.


अफजल खानच्या कबरीजवळ अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मिलिंद एकबोटे यांनी दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने तेथील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने एकबोटे यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली होती.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. कबर कोणाच्या जागेत आहे व अतिक्रमणे कोणत्या जागेत आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर, कबर महसूल विभागाच्या जागेत आहे, अतिक्रमणे वन खात्याच्या भूखंडात आहेत. असे याचिकाकर्त्याने सांगितले. त्यावर न्यायालय चांगलेच संतप्त झाले. ‘आदेश देऊनही वन अधिकारी कारवाई करत नसतील तर त्यांना तुरुंगात शिक्षा भोगायला पाठवायला हवे किंवा त्यांना कायमचे वनातच ठेवायला हवे. जे अधिकारी कारवाई करत नसतील त्यांची नावे न्यायालयात सादर करा, आम्ही योग्य ते आदेश देऊ’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

कबरजवळ असलेली अतिक्रमणे तात्काळ हटवावीत. त्यासाठी एक ठोस कार्यक्रम तयार करा व त्याची माहिती न्यायालयात सादर करा. असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.