रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पहिला गियर मीच टाकला, असा दावा करुन कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात दिसलेल्या विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याकडे घेतलं. नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे बोलत होते.


'सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं मी गुढीपाडव्याच्या सभेत मी बोललो होतो. एकत्र यावं, असं आवाहन मी केलं होतं. ही सर्व प्रक्रिया त्यानंतरच सुरु झाली' असा दावा राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

देशात इतक्या राज्यांमध्ये किनारपट्टी आहे. मग नाणार प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर गुजरातला जाईल अशी धमकी कशी काय देतात? असा सवालही राज यांनी केला. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प नको आहे, त्यामुळे तो कुठेही घेऊन जा, धमक्या देऊ नका, असंही राज ठाकरेंनी सुनावलं.

शिवसेना एकीकडे प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाल्याची घोषणा करते, तर सरकार हा प्रकल्प पुढे रेटत आहे. त्यामुळे शिवसेना जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही राज यांनी केला.