रत्नागिरीत बोट उलटून चौघं बुडाले, दोघांचे मृतदेह हाती
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2017 06:44 PM (IST)
पूर्णगडच्या पठाण परिवारातील तिघेजण या घटनेत बुडाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतल्या पूर्णगड समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटून चौघं जण बुडाले आहेत. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरु आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लाटेच्या तडाख्यानं ही बोट उलटली. बोटीत असलेले हसन पठाण, जैनुद्दीन पठाण, अब्बास पठाण आणि तवक्कल बांगी हे चार मच्छिमार समुद्रात फेकले गेले. त्यापैकी हसन आणि जैनुद्दीन यांचा मृतदेह हाती लागला आहे, तर उर्वरित दोघं बेपत्ता आहेत. लाटांच्या तडाख्याने समुद्रात बुडालेली बोट स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढली आहे. पूर्णगडच्या पठाण परिवारातील तिघेजण या घटनेत बुडाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. दोन बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमारांबरोबरच आता कोस्टगार्डची ही मदत घेतली जात आहे.