पुणे : बलात्काराचं गांभीर्य जातीवर ठरवलं जाणार असेल आणि ज्या जातीच्या मुलीवर बलात्कार होईल त्यांच्याकडून मोर्चा काढला जात असेल तर हा समाज खरंच सुसंस्कृत आहे का, असा सवाल ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.


‘पाटण येथील साहित्य संमेलनातून रावसाहेब कसबे यांना हाकलून देण्यात आलं. ही कुठली लोकशाही? महाराष्ट्रात लोकांनी बोलायचं की नाही? समजा शिवाजी महाराजांविषयी कुणाला काही बोलायचं असेल, तर त्याने बोलायचं नाही का?, असा सवालही मुणगेकरांनी उपस्थित केला.

प्रज्ञा पवारांच्या वक्तव्याचं समर्थन

जर प्रज्ञा पवार म्हणाल्या असतील की, "मराठ्यांच्या मुली या जिजाऊच्या मुली आहेत, तर मग इतरांच्या मुली कोण?‘ तर यात त्यांनी काय चुकीचा प्रश्‍न उपस्थित केला? मग तुम्ही काय त्यांना गप्प करणार का?‘ अशा शब्दात मुणगेकरांनी प्रज्ञा पवारांचं समर्थनही केलं

"आज जी-ती जात फक्त मोर्चे काढत आहे. हे कोणत्या दिशेने चाललो आहोत आपण? प्रामाणिक विचार स्वातंत्र्यावर जेव्हा गदा येते, तेव्हा फॅसिझम सुरू होतो. आपण त्याआधीच थांबायला हवं‘, असं आवाहनही मुणगेकरांनी केलं.

महाराष्ट्राचं वैचारिक अध:पतन हे महाराष्ट्र रानडेंपासून जेवढा दूर जाईल त्यावर ठरेल, हे दहा वर्षांपूर्वीचं मत खरं होताना दिसतंय, अशी खंत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर व्यक्त केली.