Ramdas Kadam Majha Katta : आता यापुढे मी रडणार नाही तर ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्या डोळ्यातून पाणी काढणार असल्याचा इशारा शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला. मला वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी निघाल्याचे रामदास कदम म्हणाले. पण यापुढं माझ्या डोळ्यातून पाणी येणार नाही असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या हातात सगळे आहे. आदित्य ठाकरे यांनी जर अशी वक्तव्य केली जर जवळ कोणी येणार नाही, असेही रामदास कदम यावेळी म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं.
 
रामदास कदम यांनी आज वेगवेगळ्या विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील खदखद देखील बोलून दाखवली. मला जवळजवळ 15 वर्ष झेड सेक्युरीटी होती. पण ज्यावेळी सेना-भाजपची 2014 साली सत्ता आली, त्यावेळी माझी सेक्युरीटी काढून घेण्यात आल्याचे रामदास कदम यांनी सांगितलं. नेमकी का सेक्युरीची काढून घेतली हे मला माहित नसल्याचेही कदम म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेबाबत त्यावेळचे तत्कालीनं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केला असल्याचे कदम म्हणाले.  एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका असे खुद्द उद्धव ठाकरेंनीच सांगल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. .


राज ठाकरेंना शिवसेनेत परत आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता


राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना शेवटच्या क्षणापर्यंत मी आणि बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत एकत्र होतो. ते माझे जवळचे मित्र आहेत. राज ठाकरे गेले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. राज ठाकरेंच्या जवळ असल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या मनात खदखद होती का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे रामदास कदम म्हणाले. राज ठाकरेंना परत शिवसेनेत आणण्यासाठी मी प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही, असेही रामदास कदम म्हणाले. राज ठाकरेंनी मला चहा घ्यायला बोलावले आहे. मी त्यांच्याकडे जाणार असल्याचे कदम म्हणाले. माझा मुलगा कोणत्याही पक्षात जाणार नाही. शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचा विचार आणि भगवा झेंडा सोडून दुसरं काही करणार नाही. बेईमानी करणार नाही. तसे काय केले तर एका मिनीटात त्याचा राजीनामा घेईन असेही रामदास कदम म्हणाले.