Ramdas Kadam Majha Katta :  आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आमदारांना गद्दार म्हणत आहेत. त्यांनी बोलताना थोड भान ठेवलं पाहिजे असे मत शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी व्यक्त केलं. त्यांचे वय 32 वर्ष आहे, माझे पक्षासाठी योगदान 52 वर्ष आहे. त्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी जे बोलले ते करुन दाखवाव असेही कदम म्हणाले. हे आमदारांचे बंड नाही हा उठाव आहे. मी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे अभिनंदन करतो असे रामदास कदम म्हणाले. पुढची अडीच वर्ष अशीच गेली असती तर शिवसेनेचे 10 आमदार देखील निवडून आले नसते असेही कदम म्हणाले.


वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं


एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं. आदित्य ठाकरे यांनी बोलताना थोड भान ठेवले पाहिजे असेही रामदास कदम म्हणाले. जोपर्यंत न्यायालयाचा अधिकृत निकाल लागत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही. वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी निघाल्याचे रामदास कदम म्हणाले. पण यापुढं माझ्या डोळ्यातून पाणी येणार नाही, तर समोरच्याच्या डोळ्यातून पाणी काढणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी यावेळी दिला. 


आणखी किती लोकांची हकालपट्टी करणार


मी 52 वर्ष पक्षासाठी दिले आहेत. माझी तुम्ही पक्षातून हकालपट्टी केली असेही रामदास कदम म्हणाले. तुम्ही आणखी किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत. जोपर्यंत न्यायालयाचा अधिकृत निकाल लागत नाही तोपर्यंत पक्ष कोणाचा याबाबत मी बोलणार नाही असेही ते म्हणाले. हकालपट्टी हा शब्द माझ्या जीवाला लागला आहे. त्यामुळं मी परत जाणं अवघड आहे. मी स्वाभिमानी आहे. अन्यायाच्या विरोधात संघर्ष करा ही बाळासाहेबांची शिकवण आम्हाला असल्याचे रामदास कदम म्हणाले.