Ramdas Athawale On Prakash Ambedkar : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे (RPI) प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. आठवले यांनी म्हटलं आहे की, 'बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. समाजाच्या हितासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.


निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून 


रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे नाव मजबूत करण्यासाठी मी देशभर फिरतो आहे. कुणी वंचितचे नाव देते कोणी इतरांचे. पण मी कायम रिपब्लिकन राहणार असंही ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाला आपल्याला व्यापक बनवायचे आहे, सगळ्या जातीच्या लोकांना त्यात आणायचे आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही त्यांचा माणूस निवडून आले नाही. निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून, असा टोलाही त्यांनी लगावला. 


आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे चार मोठे पक्ष आणि मनसेही आहे. आपण एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझे नम्र निवेदन आहे की समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे.  आपण पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे.  
 
 राज ठाकरेंनी माफी मागायला पाहिजे - आठवले
आठवले यांनी राज ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना म्हटलं की, त्यांनी माफी मागायला हवी. भोंगे काढा कशासाठी, भोंग्याचे सोंग कशासाठी.  मुसलमानाच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे बरोबर नाही. त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले आहे. आताअयोध्येत त्यांना विरोध करतायत, त्या लोकांचे म्हणणे चुकीचे नाही. राज ठाकरेंनी माफी मागायला पाहीजे. आपण बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाला आहात वाद मिटवण्याचे काम करायला पाहिजे. अंगावर भगवा तुम्ही घातला तुमचा आदर आहे, पण वाद लावण्याचे काम करू नका, असंही ते म्हणाले.