कसं मिळेल मराठा आरक्षण? रामदास आठवलेंचा फॉर्मुला
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2018 07:06 PM (IST)
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून आंदोलनात कार्यकर्त्यांनी हिंसक भूमिका घेऊ नये, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे.
फाईल फोटो
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून आंदोलनात कार्यकर्त्यांनी हिंसक भूमिका घेऊ नये, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. मराठा आरक्षण कसं देता येईल, याबद्दलही आठवलेंनी भाष्य केलं आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केवळ राज्य सरकारने कायदा करणं पुरेसं नाही. मराठा आरक्षण न्यायालयात टिकावं, यासाठी संसदेत आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून वाढवून 75 टक्के करणारा कायदा करणं आवश्यक आहे,’ असं आठवले म्हणाले. आरक्षणासाठी आठवलेंचा फॉर्मुला देशभरातील मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जाट, गुज्जर यांसारख्या सवर्ण जातीतील आर्थिक दुर्बलांना स्वतंत्र प्रवर्ग करून 25 टक्के आरक्षण देणारा कायदा संसदेने केला पाहिजे. ते करत असताना आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून वाढवून 75 टक्क्यांपर्यंत वाढवली पाहिजे. यामुळे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मुद्दा मांडला आहे, असं रामदास आठवले म्हणाले.