Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब झाला आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. "राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. 


मराराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी सहाच्या पुढे निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु, महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर काँग्रेसने आक्षेत घेतला. या संपूर्ण गोंधळात तीन तासांपासून निकाल रखडला आहे. यावरून संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपला खोचक टोला लगावलाय. 






"राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र" असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.   


राज्यसभेसाठी मतदानाची प्रक्रिया दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान पूर्ण झाली. 285 आमदारांनी मतदान केलं. चार वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, भाजपकडून या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत अवैध ठरवावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीत तशी तक्रार घेतली. 


भाजपने केलेल्या या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. त्यामुळे सध्यातरी मतमोजणीची प्रक्रिया रखडली आहे.