मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत येताना या यात्रेमुळे पनवेलहून मुंबईत येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाशीच्या खाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.


दरम्यान सदाभाऊ खोत सध्या सत्तेत आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाही, म्हणूनच ते स्वागताला येऊ शकले नाहीत, असा टोला यावेळी राजू शेट्टींनी लगावला.

पुण्यातून 22 मे रोजी खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करुन आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.

शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे.