उस्मानाबाद : गारपीट नुकसानग्रस्तांनी सरकारची तूटपुंजी मदत घेण्यापेक्षा भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढा, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. तसेच, मंत्र्यांना झोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल, शेतकऱ्यांनीही सोबत यावे, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलं.


“सहकारमंत्री देशमुख म्हणतात, भाजप सरकारने 23 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेकांना दमडीही मिळालेली नाही, मात्र सरकार सातत्याने फसव्या घोषणा करत आहे. आता गावागावातील बँका कर्जमाफी घोषणेनंतरच्या सहा महिन्यांचे व्याज आकारणीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.” असा आरोप खासदार शेट्टी यांनी केला आहे.

“शेतकऱ्यांनी संघटीत शक्तीच्या बळावर समस्यांसाठी लढले पाहिजे. आम्ही लढतोय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धसका सरकारनं घेतला आहे. त्यामुळेचं मंत्री दौऱ्यावर आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड होत आहे. तसेच मंत्रालयाला जाळी लावल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील हा जावईशोध कुठल्या मुर्ख मंत्र्यांने लावलाय हे कळेना.” अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

तसेच, पामतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले, मोठ्या प्रमाणात डाळी आयात केल्या, त्यामुळे तुरीचे दर पडले, हा सरकारच्या चुकीच्या आयात धोरणाचा परिणाम आहे. त्यामुळे शेतकरी कर्जात बूडतोय, यामागे शेतकऱ्यांचा दोष नाही. त्यामुळे आम्ही कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करण्यासाठी सातबारा करण्याची मागणी करत असल्याचंही ते म्हणला आहेत.

पाकिस्तानमधून चोरट्या मार्गाने साखर आयात केल्यानं भारतातल्या साखरेचे दर पाडले, त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांना एफआरपी देऊ शकत नसल्याची ओरड करतायत, मात्र आम्ही त्याविरोधातही लढा देणार असल्याची घोषणाही त्यावेळी शेट्टी यांनी केली.

दरम्यान, उस्मानाबादमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्यन शुगर साखर कारखाना आणि जयलक्ष्मी कारखान्यांनी पैसे बुडवलेले आहेत. दोन वर्षे थांबूनही पैसे मिळत नाहीत. आता त्याविरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं.