राज ठाकरे लोणारला येणार, हे समजल्यावर लोणार पर्यटन वाढीसाठी कार्यरत असलेल्या एका संस्थेचे भुजंग काळे, शैलेश सरदार आणि त्यांचे सहकारी आवर्जून भेटायला आले. काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज ठाकरेंना लोणार सरोवराशी संबंधित वैशिष्टयपूर्ण माहिती दिली.
लोणार सरोवराचं पाणी समुद्राच्या सातपट खारट आहे. इथल्या परिसरातील दगडमातीत सल्फरचं प्रमाण जास्त आहे. नैसर्गिक स्रोतापासून इथे फार पूर्वीपासून साबण बनवला जातोय. त्यावरूनच इथल्या काही लोकांचं आडनाव साबणकर पडलं.
मुघल बादशाह अकबर हा सुद्धा लोणारमधे बनलेला साबण वापरायचा. त्याचा उल्लेख आइने अकबरीमधे आहे. खजुराहोप्रमाणे इथल्या मंदिरात मैथुनशिल्प आहेत.
इथल्या मंदिराच्या परिसरात दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीला गोड पाणी, तर दुसऱ्या विहिरीला खारट पाणी आहे. या दोन विहिरींना सासू-सुनेच्या विहिरी म्हणतात.
राज ठाकरे ही सगळी माहिती लक्षपूर्वक ऐकत होते. पण, सासू-सुनेच्या विहिरीचा उल्लेख होताच, "यातील सासू कोण आणि सुन कोण" असा प्रश्न त्यांनी विचारला आणि उपस्थितांमधे एकच हशा पिकला.